आकाशकन्या डॉ. कल्पना चावला


            


आकाशकन्या डॉ. कल्पना चावला 

           

 अवकाशातून पृथ्वीच्या दिशेने एक अंतराळयान ताशी २०,१२० किलोमीटर इतक्या भन्नाट वेगाने प्रवास करत होते. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यावर स्थानिक वेळेनुसार सकाळी ०९ वाजून १६ मिनिटांनी फ्लोरिडातील केनेडी अवकाशतळावर यान उतरणार होते. परंतु ०८ वाजून ५६ मिनिटांनी तापमानाची नोंद ठेवणारी कार्यप्रणाली बंद पडली. पुढच्या ०३ मिनिटात वातावरणाचा दाब नियंत्रित ठेवणारी यंत्रणा बंद पडली. यानात पृथ्वीवरून संदेश जात होता, To Columbia, here is Houston, we see your tire pressure messages and we did not copy your last message.” त्यावर या कोलंबिया यानाचे मोहीम प्रमुख कमांडर रिक हजबंड उत्तर द्यायला सरसावले, Roger  but…..” आणि पुढील क्षणी यानाचा पृथ्वीशी असलेला संपर्क तुटला. कमांडर रिक यांच्या या but नंतर कोलंबियातून कोणताही संदेश पृथ्वीवर पोचू शकला नाही. फ्लोरिडा अवकाशतळावर उतरण्यासाठी अवघी १६ मिनिटे बाकी असताना काही सेकंदातच संपूर्ण जगाला हादरवणाऱ्या भीषण घटनेची नोंद इतिहासात झाली. कोलंबिया यानाचा स्फोट झाला आणि यानात असलेल्या सात अंतराळवीरांची राखसुद्धा पृथ्वीवर आली नाही. सारे काही संपले...! मायकेल एन्डरसन, लॉरेल क्लर्क, रिक हजबंड, विल्यम मेकल, इलॉन रॅमन, डेव्हिड ब्राऊन आणि कल्पना चावला या सातही अंतराळवीरांना जगाने गमावले.
कोलंबिया यानातील सात अवकाशवीर.
          दिल्लीपासुन अंदाजे १२५ किलोमीटर दूर असणाऱ्या पंजाबातील कर्नाल या गावाची रहिवासी असलेली कल्पना चावला ही अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला होती. आपल्या आईप्रमाणेच धार्मिक वृत्तीची असलेली अत्यंत साधेपणाने राहणारी कल्पना स्वभावाने खूप खेळकर उत्साही होती. एरोनॉटिक्ससारख्या किचकट विषयात तिला जितकी रुची होती तितकीच भारतीय शास्त्रीय संगीतातदेखील होती. म्हणूनच तर नासातर्फे प्रत्येक अंतराळवीराला स्वतःसोबत एक ऑडिओ कॅसेट नेण्यास सांगितले तेव्हा कल्पनाने पंडित रविशंकर यांच्या सतार वादनाची कॅसेट सोबत घेतली होती. अवकाशयात्रा करण्याची जिद्द बाळगून कल्पनाने पंजाब विद्यापीठातून एरोनॉटिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली आणि पुढील उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या कोलोरॅडो विद्यापीठातून एरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये डॉक्टरेट मिळवली आणि नासा या जगप्रसिद्ध संस्थेत संशोधक म्हणून काम करू लागली. अंतराळवीर होण्याच्या दृष्टीने कल्पनाला महत्वाची संधी लाभली ती १९९७ च्या नोव्हेंबर महिन्यात. याच कोलंबिया यानातून तिने तब्बल १६ दिवसांचा अवकाश प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला. या सफरीचा अनुभव तिच्यासाठी खूप रोमहर्षक होता. तत्कालीन पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्याशी अंतराळातून बोलताना “मै दुनिया के नये नजरे देख रही हु” या शब्दात कल्पनाने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. या आपल्या पहिल्या मोहिमेमध्ये तिने व सहकाऱ्यांनी धातू आणि इतर स्फटिकरूप पदार्थ अवकाशातील वजनरहित स्थितीमध्ये द्रवरुपातून स्थायुरूप अवस्थेमध्ये कसे जातात, यावर संशोधन केले होते. १९९७ च्या यशस्वी अंतराळ सफरीनंतर सहा वर्षांनी १६ जानेवारी २००३ रोजी डॉ. कल्पना चावला पुन्हा एकदा त्याच कोलंबिया यानातू आपल्या सहा सहकाऱ्यांसोबत अवकाश सफरीवर निघाली. पण यानंतर हे सात अंतराळवीर कधीही परतले नाहीत. १९८१ सालापासून अवकाश सफरी करणाऱ्या कोलंबिया अवकाशयानाने तब्बल २४ वेळा उड्डाणे केली होती आणि यात एकही अपघात झाला नव्हता. मात्र १६ जानेवारी २००३ च्या मोहिमेवेळेस यानाची स्थिती समाधानकारक नव्हती. यानाच्या इंधनटाकीवर असलेले उष्णतारोधक आवरण सैल झाले होते. अर्थात यामुळे फारशी काळजी करण्यासारखे नाही, असे मोहिमेचे संचालक लेरॉय केन यांनी अगोदरच स्पष्ट केले होते. वातावरणाच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर १० मिनिटांत यानापल्या नियोजित स्थळी उतरते. या १० मिनिटांत मात्र त्याचे तापमान प्रचंड वाढते. यानाचे तापमान सामान्य स्थितीत येण्यासाठी १३ मिनिटांचा कालावधी आवश्यक असतो. म्हणजे एकूण २३ मिनिटे ही एखादे अवकाश यान उतरताना अत्यंत महत्वाची असतात. कोलंबियाचा अपघात याच कालावधीत झाला. कदाचित २० वर्षांपेक्षाही जुने असल्याने या प्रचंड तापमानात यानाचा निभाव लागला नसावा.     

  
कोलंबिया अंतराळयान 
             त्या भयानक अपघातात कोलंबिया यान जरी नष्ट झाले तरी या सर्वांची कामगिरी वाया गेली नाही. निर्वात पोकळीमध्ये विविध कीटक व इतर प्राणी कसे वागतात, याचा अभ्यास करण्यासाठी मुंग्या, रेशीम अळी, भुंगा, उंदीर यांनाही अवकाशात पाठवले होते. पृथ्वीवर केलेले प्रयोग आणि अवकाशात केलेले प्रयोग यांच्या परिणामात प्रचंड तफावत असते. वजनरहित अवस्थेत केलेल्या प्रयोगांत अनेक महत्वपूर्ण निरीक्षणं नोंदवता येतात. त्यामुळे अवकाशातील प्रयोगांचे निष्कर्ष अधिक अचूक असतात. आपल्या १६ दिवसांच्या सफरीत कल्पना आणि सहकाऱ्यांनी सुमारे ८० प्रयोग केले आणि विशेष म्हणजे हे सर्वच्या सर्व प्रयोग कमालीचे यशस्वी ठरले. त्यांचे निष्कर्ष अगोदरच पृथ्वीवर पाठवले गेले होते.  निर्वात अवस्थेत मानवी मेंदू वेगळ्या पद्धतीने कार्य करतो. यासाठी देखील या मोहिमेत प्रयोग केले गेले. इंधनामध्ये असलेले घातक कण काढून टाकून अधिक ज्वलनक्षमता असलेले आणि पर्यावरणाला धोकादायक नसणारे इंधन तयार करणे शक्य असल्याचे प्रयोगाद्वारे सिद्ध करण्यात या मोहिमेत यश आले. त्याचप्रमाणे मानवी शरीर आणि कॅन्सर पेशींची वाढ या विषयांवर देखील प्रयोग करण्यात आले होते. कोलंबिया यानात करण्यात आलेल्या या प्रयोगांमुळे आपल्या पुढच्या पिढ्या कायम कल्पना चावला आणि इतर अंतराळवीरांच्या ऋणात राहणार आहेत. डॉ. कल्पना चावला यांचा जीवनप्रवास इतक्या लवकर आणि अशा भयानक प्रकारे संपला, याची खंत मात्र प्रत्येकाच्या मनात कायमची राहील...!  

सागर कुलकर्णी   

https://amzn.to/2QCz7Vf

spacer